
नुकतेच 'असूरवेद' ही कादंबरी वाचून संपवली. हो संपवली म्हणजे हातातली कामे बाजूला ठेवून प्रसंगी टाळून ही कादंबरी संपवली इतकी ती ओघवती कादंबरी आहे. पण फक्त ओघवती कादंबरी आहे म्हणून मी 'असूरवेद' बद्दल लिहित नाहिये. तर या कादंबरीने मला एक सखोल चिंतन करण्यास भाग पाडले म्हणूनही मी या आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल लिहित आहे. संजय सोनवणी हे तसे वादग्रस्त लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. पण या कादंबरीद्वारे त्यांनी कादंबरी लेखनात एक क्रांतिकारी पायंडा पाडला आहे. सर्वमान्य जे आहे त्यापेक्षा स्वतः संशोधन करुन जे निष्कर्ष काढले आहेत (त्यावर त्यांनी स्वतंत्र पुस्तके देखील लिहिली आहेतच) त्याआधारे कादंबरी रचण्याचा प्रयोग करणे हा एक धाडसी प्रयोगच म्हणावा लागेल. कारण कादंबरी चे रुप सर्वसामान्य जनतेच्या मनावर जेवढी पकड घेते तेवढी पकड संशोधनात्मक ग्रंथ घेत नाहीत हे खेदाने म्हणावे लागेल. याचे कारण सर्वसामान्य वाचकवर्ग कादंबरी, कथा व कविता या साहित्यप्रकारांत जेवढा रमतो तेवढा संशोधनग्रंथ, पुरातत्त्व विद्या यासारख्या विषयांत रस असल्याशिवाय अशी पुस्तके हातातही घेत नाही.
असूरवेद या कादंबरीतून वैदिक कालीन इतिहासाची रंजक प्रकारे मांडणी करुन लेखकाने वाचकांमध्ये या काळातील सर्व ग्रंथांचे मूल स्वरुप समजून घेण्याची जिज्ञासा जागृत केली आहे. प्राचीन काळी सर्वमान्य असलेले चारच वेद अस्तित्त्वात नव्हते तर त्यांना वेदांचे स्वरुप कसे आले आणि त्याकाळी कित्येक ग्रंथ सामग्री उपलब्ध होती. व कोणत्या कारणांसाठी अनेक पुरातन धर्मग्रंथांचा नाश केला गेला? असे अनेक प्रश्न मनांत उभे राहतात. त्यासाठी ही धार्मिक थरारकथा अवश्य वाचायला हवी
सर्वसामान्य वाचकच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाचकांना समोर ठेवून संजय सोनवणी यांनी असुरवेद ही सुंदर कादंबरी देताना वाचकांना एका मागोमाग एक परंपरागत समजुतींना धक्के देतानाच एक सखोल चिंतनही करायला लावतात. आणि मला वाटते की हेच या कादंबरीचे खरे यश आहे. धर्माने उभ्या केलेल्या जातियवादाच्या भिंती देखील 'असूरवेद' मधून साकारलेल्या प्रमुख पात्रांच्या माध्यमातून तोडायचे धाडस लेखक संजय सोनवणी यांनी केलेले आहे. यासाठी त्यांची प्रशंसा जरुर केली पाहिजे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा