मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

समथिंग - एक थरकापवणारी भयकथा

 

पुस्तकाचे नाव : समथिंग

लेखक : सुहास शिरवळकर

मला समथिंग का आवडते त्याची अनेक कारणे आहेत.

१. इतर भयकथा मधून जे दिसते ते हिरवे डोळे, अक्राळ विक्राळ लोंबत्या मांसाचे चेहरे... असे कोणतेही उल्लेख समथिंग मध्ये नाहीत. असे असूनही एक भयाण वातावरण निर्मिती करणे हे सुशिंचे मोठे कसब मानतो मी.

२. दोन जुळ्या भावांची समानता व वैचारिक कनेक्टिव्हिटी या मानसिक गोष्टीचा मस्त वापर समथिंग मध्ये आहे.

३. दानिश या भावाचा गूढ मृत्यू होतो आणि दुसरा भाऊ त्याच्या लग्न झालेल्या बायकोला पहिल्यांदा भेटतो. आणि सुरू होतें एक थरकापवणारे एक जबरदस्त नाट्य.

४. रात्रीच्या वेळी भयकथा वाचून भय निर्माण करणाऱ्या अनेक कथा आहेत. पण समथिंग दिवसा वाचताना देखील अंगावर काटा येतो जो इतर भयकथा वाचताना येत नाही. आणि समथिंग तुम्ही रात्री वाचून बघाच. कशी हालत होते ते 😜😜

५. साहित्य मूल्याच्या दृष्टिकोनातून देखील समथिंग एक वेगळी कादंबरी ठरते.

६. काळी मांजर आणि गूढ पद्धतीने येणारी भावाची बायको लिझ एक थरकाप उडवते

७. गावातील एकामागोमाग एक विचित्र घटना वाचकांना भयभीत करतात.

एवढी बलस्थाने सांगितल्यावर कथेची ओळख मुद्दाम करून देत नाहीये. कारण एकदा कादंबरी सुरू झाली की पानोपानी  निर्माण होणारी उत्कंठा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. आणि ती उत्कंठा शांत करण्यासाठी समथिंग ही कादंबरी तुम्ही पूर्ण वाचणारच 😁

काय मग वाचताय समथिंग रात्रीच्या वेळी ?? केव्हाही वाचा. अनुभव सुंदर येईल याची खात्री आहे.

मृत्युरेखा : तमिळ वाघांच्या अंतरंगातील सत्य उलगडणारी थरारकथा

 

मृत्युरेखा : तमिळ वाघांच्या अंतरंगातील सत्य उलगडणारी थरारकथा








मराठी साहित्य विश्वात थरारकथांना एक वेगळे परिमाण देणारे लेखक श्री. संजय सोनवणी यांची "मृत्युरेखा" ही तशी जुनी कादंबरी. त्यात अजून सुधारणा करुन त्यांनी हीच कादंबरी इंग्रजीतून "On the Brink of Death" पुन्हा लिहिली व त्याचे इंग्रजी वाचकही या कादंबरीचे कौतुक करतात. असो. आपण मराठी "मृत्युरेखा" कादंबरीचा वेध घेऊयात.

कादंबरी सुरु होते तेव्हा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या एलटीटीई ने घडवून आणलेली असते. श्रीलंकेच्या बाजूने शांतीसेना पाठवून राजीव गांधींनी (एलटीटीई च्या मते) त्यांनी मोठी चूक केलेली असते. निवडणुकीच्या प्रचार दौर्यासाठी राजीव गांधी आलेले असताना त्यांची हत्या करुन एलटीटीईने सूड उगवलेला असतो. अशा पार्श्वभूमीवर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असलेला एक इंजिनिअर वडिलांच्या आकस्मिक मृत्युमुळे वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय चालवण्यासाठी सरकारी नोकरी सोडून देतो व ट्रॉलर च्या साहाय्याने उपजिविका करत असतो. हा आपल्या कादंबरीचा सर्वार्थाने नायक. एक सामान्य जीवन जगत असलेला व स्वतःच्या गर्भवती पत्नीसह सुखी संसाराची स्वप्ने बघणारा वेणू एलटीटीईच्या प्रभाकरन ने विणलेल्या एका भयंकर जाळ्यात अडकतो. वेणू त्या जाळ्यातून सुटतो का? कृष्णनचे पुढे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे थरारक आणि अतिशय वेगवान कथानकात मिळतात.  

"मृत्युरेखा" ही मनाला अनेक आंदोलने देणारी कादंबरी आहे असे मी मानतो. कादंबरीच्या नायकाला अनेक दिव्यातून जावे लागते. स्वतःच्या गर्भवती बायकोला गर्भासकट जिवंत जाळण्यात येते,  अत्यंत विश्वासू वर्तुळात असलेल्या कृष्णनसारख्या हस्तकांना प्रभाकरन सारख्या दहशतवादी प्रवृत्ती केवळ स्वतःचे स्थान टिकवण्याच्या भीतीपोटी बळी देतात. दहशतवादाच्या मुळाशी असलेले हे भयंकर मानसशास्त्र लेखकाने अतिशय ताकदीने मांडले आहे. इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास हिटलर, मुसोलिनी, सद्दाम हुसेन वा कोणीही हुकुमशहा असो, त्यांनी अनेकांचे बळी घेतलेले आहेत हेच सिद्ध होते. 
 अतिशय खिळवून ठेवणारी हि कादंबरी म्हणजे मृत्युरेखा . अवश्य वाचा 

पुस्तक परिचय : स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !

 

पुस्तकाचे नाव : स्टीव्ह जॉब्स एक झपाटलेला तंत्रज्ञ !
लेखक : अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 
पृष्ठ संख्या : १५२
किंमत : १५० रुपये (₹)
माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐ (५ पैकी)

नुकतेच स्टीव जॉब्स यांची चरित्रात्मक ओळख करून देणारे सदर पुस्तक वाचले.  सदर पुस्तक अवघ्या ८ दिवसात पूर्ण केल्याचा लेखकांनी स्वतःच्या क्षमते बद्दल आणि रात्रीचा दिवस काम करून झपाटून काम केल्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख मनोगत मध्ये केला आहे. ते वाचून वाचकाच्या मनात पुस्तकाबद्दल एक अपेक्षांची छान प्रतिमा निर्माण होते.  
८ दिवसांत झपाट्याने काम करून पुस्तक पूर्ण केल्याबद्दल लेखक द्वयींचे परिश्रम घेतल्याबद्दल अभिनंदन. 
आता वळूयात पुस्तकाच्या दर्जाकडे माझ्यामते हे स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल कंपनीची ओळख करून देणारे हे चांगले पुस्तक आहे. पण घाईघाईने पुस्तक बाजारात आणण्याच्या नादात हे पुस्तक पुरते फसले आहे. कसे ते थोडक्यात बघुयात. 
१. संपूर्ण पुस्तक ज्याच्यावर आहे तो स्टीव्ह जॉब्स वयाच्या कितव्या वर्षी मेला हे पुस्तकात कुठेही दिसले नाही. विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स च्या खऱ्या वडिलांच्या ८० व्या वर्षी मेला हे त्यात आले आहे. 
२. पुस्तकात एके ठिकाणी प्रूफ रीडिंग करताना स्टीव्ह जॉब्स आणि ऍपल हे योग्य शब्द असल्यामुळे ऍपल ने म्हटले असे छापले गेले आहे. ते स्टीव्ह जॉब्स ने म्हटले असे हवे होते. 
३. बोर्डरूम पुस्तकातून काही प्रमाणात उचलेगिरी केल्याचे लेखकांनी स्वतःच सांगितले आहे. पण हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाला जे कळते ते हे की ऍपल कंपनी सोडावी लागली आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी स्टीव्ह जॉब्स ने कसा संघर्ष केला , त्याचे मार्केटिंग आणि विक्री कौशल्य कसे अचंभित करणारे होते. वगैरे सर्व कॉर्पोरेट क्षेत्राची ओळख करून दिल्या सारखे दिसते. एकूण बोर्डरूम  पुस्तकाचा प्रभाव पूर्ण पुस्तकावर दिसतो आणि स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीचे कर्तृत्व दुय्यम दिसते. 
४. कॅलिग्राफी हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता पण तो तितक्या परिणामकारक रित्या लेखकांना मांडता आला नाही. उदाहरण द्यायचे झाले तर ऍपल च्या प्रॉडक्ट्स साठी जी पांढरी शेड एक खास ऍपल ची म्हणून ओळख आहे त्या शेड साठी स्टीव्ह जॉब्स ने ऍपल मधील तज्ज्ञांना खूप फैलावर घेतले होते. जॉब्स ला जी शेड हवी होती ती मिळाल्यावरच त्याने प्रोडक्शन साठी परवानगी दिली होती. हीच गोष्ट त्याने सर्व ठिकाणी केली आहे. 
यावरून स्पष्ट होते की स्टीव्ह जॉब्स हा फक्त उत्पादन छान दिसणे यावर फोकस करून विकणारा नव्हता तर बुद्धिमत्तेच्या कसोटीवर ऍपल ची उत्पादने सर्वश्रेष्ठ आणि काळाच्या पुढील ठरतील यासाठी त्याचे प्रयत्न होते.
५. एकूणच पुस्तकातून स्टीव्ह जॉब्स ची प्रतिमा उत्कृष्ट विक्रेता म्हणून निर्माण झालेली आहे जी चुकीची आहे. कदाचित जॉब्स चे महिमा गान करताना लेखकांच्या नकळत असे झालेले असू शकेल. पण जॉब्स हा उत्कृष्ट विक्रेता नव्हता तर उत्कृष्ट उत्पादने निर्माण करणारा होता. आणि की उत्पादने जशी बनवलेली आहेत तशीच ती लोकांसमोर सोप्या पद्धतीने तो मांडायचा. मुळात मालात दम असेल तर ग्राहक विकत घेतोच घेतो हा त्याचा मुख्य दृष्टिकोन होता. 
आणि हा मूळ दृष्टिकोन मांडून स्टीव्ह जॉब्स ची एक  बुध्दीमान आणि दर्जेदार उत्पादने निर्माण करणारा कुशल तंत्रज्ञ ही प्रतिमा निर्माण करण्यात हे पुस्तक काहीसे भरकटल्या सारखे वाटते. 
एकूण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. पण ऍपल या कंपनीच्या इतिहासाची आणि कॉर्पोरेट युद्धाची सावली पुस्तकावर पडल्यामुळे स्टीव्ह जॉब्स चे कर्तृत्व जरासे झाकोळले गेल्यासारखे झाले आहे एवढेच. सुदैवाने स्टीव्ह जॉब्स चे अधिकृत चरित्र देखील मराठीत उपलब्ध झालेले आहे. ते वाचकांनी अवश्य वाचावे. म्हणजे मी काय म्हणतो आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येईल. 

कथासारित्सागर एक अद्भुत प्राचीन ग्रंथ

 

 


मूळ ग्रंथ बृहत्कथा हा महाकवी गुणाढ्य याने इसवीसना पूर्व पहिल्या ते इसवीसना नंतर पहिल्या शतकाच्या काळात कधीतरी लिहिला याबद्दल विद्वानांत एकमत आहे. महाभारता पेक्षाही श्रेष्ठ असा हा ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. कथेप्रमाणे राजाने महाकवी गुणाढ्य याला राज्याबाहेर हाकलून दिल्यावर त्याने प्रत्येकी एक लक्ष श्लोक याप्रमाणे सात विद्याधरांच्या कथा रचून प्राकृत पैशाची भाषेत मूळ ग्रंथ लिहिला. राजाने ग्रंथ नाकारल्यामुळे ग्रंथाचे वाचन जंगलात करून तो एकेक पान महाकवी गुणाढ्य जाळत होता. सर्व प्राणिमात्र तहान भूक विसरून हा अद्भुत ग्रंथ ऐकत होते. शिकार्यांना राजासाठी सकस मांस मिळत नसल्यामुळे  राजाने शोध करविला आणि त्याच्या लक्षात महाकवी गुणाढ्य याची महती लक्षात आली. तेव्हा राजाने त्याला थांबवले. तोपर्यंत सहा विद्याधर कथा आग्नेय स्वाहा झालेल्या होत्या. उरलेल्या एक लक्ष श्लोक संख्येची एकच नरवाहन दत्त या विद्याधर राजाची कथा शिल्लक उरली.

पुढे इसवीसनच्या नंतर ११ व्या शतकात काश्मीर येथील एका पंडिताने बृहत् कथेचा संस्कृतात अनुवाद केला. तो आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे आज कथासारित्सागर या नावाने महाकवी गुणाढ्य याची मूळ बृहत् कथा आपल्याला वाचावयास मिळते आहे.

इंग्रज अधिकारी एम. एन. पेंझेर यांना हा अमूल्य ग्रंथ मिळाला. त्यांनीं तो सविस्तर इंग्रजीत दहा खंडांतून अनुवादित केला आहे. मराठीत वरदा प्रकाशन च्या ह. अ. भावे यांनी ५ खंडांत कथासरित्सागर मराठीत आणले आहे. याही आधी मराठी अनुवाद उपलब्ध होते. पण ते जुन्या मराठीत आणि संक्षिप्त केले असल्यामुळे कालबाह्य झाले होते. दुर्गा भागवत यांची अत्यंत अभ्यासपूर्ण सविस्तर प्रस्तावना हेही या कथासारित्सागर च्या अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणतीही कथा वाचली तरी अत्यंत आनंद मिळतो. अवश्य वाचावे असे हे ५ खंड आहेत.


सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

दोन हातावरच्या "समांतर" रेषा .... एकाच आयुष्याची उडाली त्रेधा

 


पुस्तकाचे नाव : समांतर (कादंबरी)

लेखक : सुहास शिरवळकर

माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐⭐⭐ (५ पैकी)

दोन हातावरच्या "समांतर" रेषा .... एकाच आयुष्याची उडाली त्रेधा  
समांतर या कादंबरी वर मागच्या वर्षी मार्च २०२० मध्ये वेब सिरीज चां पहिला भाग MX Player या ॲप आणि वेबसाईट वर रिलिज झाला तेव्हा लोकांना ही वेब सिरीज प्रचंड आवडली होती. कोरोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीचे फटके सर्वच क्षेत्राला बसले त्यात मनोरंजन क्षेत्र सुद्धा भरडले गेले. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत कलाकारांनी शूटिंग पूर्ण केले आहे आणि बहुतेक पुढील महिन्यात जून २०२१ मध्ये उरलेला अर्धा भाग सीझन २ रिलिज होईल. 

एकूणच याचे प्रमुख श्रेय जाते ते या कादंबरीच्या सशक्त कथानकाला आणि कादंबरीचे लेखक सुहास शिरवळकर यांना. 
प्रत्येकाच्या मनात सुप्तपणे वाटत असते की आपल्यासारखे शापित आयुष्य अजून कोणाचे नसेल. पण समजा असेलच तर ? नेमक्या याच कल्पनेवर आधारित समांतर ही कादंबरी आहे. 
कुमार महाजन परिस्थितीला वैतागलेला. आणि अचानक त्याला समोर नजरेत येतो त्याचा भविष्यकाळ जाणून घेण्याची सुवर्णसंधी. 
कोणीतरी असा मनुष्य आहे त्यांचेच आयुष्य कुमार महाजनला जगायचे आहे. मग शोध सुरू होतो त्या माणसाचा.... सुदर्शन चक्रपाणी चां. 
सुदर्शन चक्रपाणी त्याने स्वतः लिहून ठेवलेल्या डायऱ्या पण कुमार महजनला देतो. 
पण रोज उद्याचेच पान वाचायचे अशी त्याची अट असते. 
पुढे काय होते ? एकदम थरार अनुभवायला तयार असाल तर वाचा समांतर कादंबरी. 




*ब्लॅक किंग* - एक काळया युगाची सुरुवात? -

 


पुस्तकाचे नाव : ब्लॅक किंग (कादंबरी)

लेखक : सुहास शिरवळकर

माझे पुस्तकाचे रेटिंग :  ⭐⭐⭐⭐⭐ (५ पैकी)

*ब्लॅक किंग* - एक काळया युगाची सुरुवात? 

ब्लॅक किंग, माफियांच्या काळया जगातला, एक अनभिषिक्त सम्राट. सुहास शिरवळकर यांच्या बहारदार लेखणीतून त्यांचे नायक जितके वाचकांच्या मनावर कायमचे कोरले जात तसेच त्यांनी रंगवलेले खलनायक देखील वाचकांच्या मनात घर करून राहतात. ब्लॅक किंग हा खलनायक त्यातला शिरोमणी ठरावा.

ब्लॅक किंग या कादंबरीची सुरुवातच मुळी होते एका भयंकर घटनेने. डॅनी, प्रिन्स, इन्स्पेक्टर दिनेश सायगल या त्रिकुटाला मंदार शिवाय अस्तित्व आहे असे वाटत नसे. डॅनी ला चुकून एक फोन येतो. पोलिस स्टेशन ऐवजी त्यालाच तो फोन आलेला असतो. आणि रोंग नंबर टाळून देखील शेवटी विचारतो की काय गडबड आहे? पलीकडची व्यक्ती सांगते की इथे बंदरावर एका व्यक्तीचा खून झालाय आणि पोलिसांना ही माहिती द्यायची आहे. डॅनी विचारतो त्या मृत व्यक्तीची ओळख पटली का? तर पलीकडची व्यक्ती सांगते खिशात मंदार पटवर्धन हे विझिटींग कार्ड सापडले आहे आणि जवळच एक फेयर डील कार उभी आहे.
डॅनी फोन बंद करून एकदम खाली बसतो आणि हमसून रडायला लागतो. मंदरच्या खुनाची बातमी सर्वात पहिली त्यालाच आणि तेही एका रॉंग नंबर मुळे कळावी यासारखे दुसरे दुर्दैव नव्हते.
आपला नायक कादंबरीच्या सुरुवातीलाच मेलेला आहे. आणि डॅनी हताशपणे बसलेला आहे. इतर लोक त्यावेळी काय करत होते ? या बेसावध क्षणी डॅनी बेभान होऊन सूड घेण्यासाठी निघणार असतो. शिल्पा त्याला सावध करते. ट्रॅप तर नाही ना हा ? अशी शंका येताच मंदारच्या घरी फोन लावून खात्री करून घ्यायला लावते. पुढे क्लू मिळतात आणि मंदार खरोखर डॉकयार्ड वर गेलेला असतो आणि खून होण्याच्या काही वेळ आधीच तेथून निघालेला असतो.
म्हणजे मंदार खरेच मेलाय तर. डॅनी अतिशय त्वेषाने तयार होतो. २४ सुरे अंगावर बाळगून तो निघाला होता.

शिल्पा अजूनही संयमाने हे प्रकरण
घेत होती. ती प्रिन्स आणि दिनेश सायगल ला फोन लावणारच होती.
डॅनी ची पाँटेक हवेशी स्पर्धा करत पळत होती. डॅनी चे डोके सुन्न झाले होते.
मंदारला कोणी मारले असेल ? माहिती नाही
मंदार च्याच प्रेता जवळ त्याची डेमलर कार कशी सापडली?
माहिती नाही.
कोण दुश्मन आहे ज्याची ताकद एवढी मोठी आहे की मंदारला मारू शकेल ?
माहिती नाही.
अशा कित्येक अनुत्तरित प्रश्नांनी डॅनी एकमेव क्लू जिथे मंदार चे प्रेत आहे तिथे प्रेफरन्स शिपिंग कंपनी च्याच कार्यालयात घुसतो.
डॅनी पोहोचतो तेव्हा अंधार असतो. पूर्ण तयारीत डॅनी घुसतो.
पुढे काय होते ?
माहिती नाही 😁😁 😜
यापुढील कथानक सांगून लज्जत घालवत नाही.

पण ब्लॅक किंग उर्फ हरीश चंदानी ने मागील एका प्रकरणात (गोल्ड हेवन बहुतेक) मंदारला सांगितलेले असते की तो परत येईल आणि तेव्हा तो कोणालाही संधी देणार नाही. ब्लॅक किंग चे हस्तक एल्पार, पहाड, सायली परत येतात हे  नक्की. पण ते कसे येतात ? डॅनी सोबत बँकिम चक्रवर्ती, त्यांची मुलगी आणि मंदारची प्रेयसी रश्मी , प्रिन्स आणि दिनेश या गँगचा खात्मा ब्लॅक किंग स्वतःच्या पद्धतीने कसा करण्याचा बेत आखतो आणि तो तडीस जातो की नाही? मंदार चे प्रेत सर्वांना दिसते काय ? नायक मेलाय अशा विपरीत स्थितीत मंदार ची गँग ब्लॅक किंग शी लढू तरी शकत होती का?
पुढे काय होते ते मुळातच वाचण्यासारखे आहे.
ब्लॅक किंग च्या काळया युगाची सुरुवात होते की नाही?
मंदार ला बेसावध ठेवून ब्लॅक किंग कार्यभाग साधतो कसा?
डॅनी , प्रिन्स आणि दिनेश यांचे पुढे काय होते?
अशा प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वाचाच *ब्लॅक किंग* 😍😍

****************************


पडद्याआड - सुहास शिरवळकर यांची एक गुंतागुंतीची रहस्यकथा

 



पुस्तकाचे नाव , त्याचे मुखपृष्ठ आणि कादंबरी यांचा परस्पर संबंध अतिशय समर्पकपणे आढळून येणाऱ्या मोजक्या लेखकांत सुहास शिरवळकर यांच्या समावेश होतो.
पडद्याआड चेच बघा ना. पडद्याआड लपलेल्या व्यक्तीचे फक्त बुट घातलेले पाय दिसतात. पूर्ण कादंबरी वाचून झाल्यावरच हे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे वाचकांना अवश्य जाणवते. कारण संपूर्ण कादंबरी याच घटनेच्या अवती भवती फिरत राहते.
आता बघुयात पडद्याआड नेमके काय काय दडले आहे ज्यामुळे वाचकांना ही कादंबरी वाचायचा अनिवार मोह झालाच पाहिजे
कादंबरी सुहास शिरवळकर यांचा मानसपुत्र अमर विश्वास याची असल्यामुळे कोर्ततले सीन आणि वेगवान शोध मोहीम या कादंबरीच्या गाभ्यात असणार हे उघड आहे. पण पडद्याआड ही सर्वार्थाने इतर अमर कथांपेक्षा जरा वेगळी ठरते. पाहुयात काय आहे या पडद्याआड.
जिमी आणि रणजित दोघा अट्टल बदमाशांची जुगारात केलेल्या हातचलाखी मुळे मारामारी होते त्यात रणजित जिमी आणि त्याच्या चेल्यांची जबरदस्त धुलाई करतो. लोळा गोळा होऊन पडलेल्या जिमी समोरून पैसे घेऊन रणजित बेफिकीर पणें निघून जातो. तेव्हाच जिमी ठरवतो की रणजित चां काटा काढायचा.
कोण असतो रणजित?
भैय्या सारंग याची कलकत्त्यात गॅंग असते. आणि त्याचा रणजित महत्त्वाचा माणूस असतो. काहीतरी गडबड करून रणजित भैय्या सारंग चां एक स्मगलिंग चां लॉट घेऊन मुंबईला पळून येतो. मुळातच अट्टल बदमाश असलेला रणजित मजेत आणि बेफिकीर आयुष्य जगत असतो. जिमी शी झालेला प्रसंग रणजित विसरलेला असतो. अशा कितीतरी जिमींना त्याने आगोदर संपवलेले असते त्यामुळे असल्या चिल्लर गुंडांना रणजित घाबरण्याचे कारणही नसते.
अचानक एकदा त्याच्या कारचा पाठलाग होतो. एकूण पाच जण असतात. सहज त्याला जिमी आठवतो. स्वतःच्या अपार्टमेंट मध्ये जाऊन रणजित वाट बघत असतो. पाचही जण गुपचूप फ्लॅट मध्ये येतात. बेडरूम मध्ये रणजित पहुडलेला बघून अंधारात सगळे आपापले सुरे घेऊन त्याला सर्वत्र भोसकतात. आणि काम झाल्याची  खात्री पटताच निघून जातात. लपलेला रणजित बाहेर येऊन स्वतःशी बोलू लागतो. पुन्हा एकदा त्याच्या रबरी बाहुली ने त्याला वाचलेले असते. आता रणजित निर्धास्त होतो आणि बेडवर आडवा होऊन झोपून जातो. बऱ्याच वेळाने पडद्याआड एक हालचाल होते. पडद्याआड लपलेली व्यक्ती बाहेर येते आणि रणजित च्याच उशाखालचे साइलेंसेर लावलेले रिव्हॉल्व्हर पकडून तीन शॉट्स रणजित च्याच डोक्यात झाडते.
आत्महत्या दाखवण्यासाठी ट्रिगर वरती रणजित चां हात ठेवून देते. इतक्यात दार वाजते. खुनी माणूस दार उघडतो तर दारात सॉलोमन (रणजित चां शेजारी) असतो. खून करण्या ऐवजी त्याचा चेहरा पाहिल्यामुळे खुनी सॉलोमन ची जीभ कापतो आणि डोळे काढून ठेवतो. आता खून्याचे वर्णन सॉलोमन करू शकणार नसतो.
अशी एकूण सुरुवात होते. मध्येच अनेक पात्रे उगवतात... रणजित ची प्रेयसी फरियास ... तिचे मादक सौदर्य... ती जिमीच्या बार मध्ये कॅब्रे डान्सर का असते ? जिमी आणि रणजित ची लढाई पूर्वनियोजित असते का ? रणजित चां बॉस भैय्या सारंग त्याच्या मागावर असतो का ? त्याचा स्मग्लींग चा माल रणजित कडे सापडतो का ? सोनेरी पेंटिंग्ज चे रहस्य काय असते ? रणजीत च्याच बिल्डिंग मध्ये राहणारी अरळकट्टी कोण असते ? तिच्याकडे येणार्यांकडे वॉचमन दुर्लक्ष का करत असतो ?
रणजित च्या खुनाचे कोडे सुटते का?
बॅरिस्टर अमर, गोल्डी, इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल यांना खुनाचा गुंता सोडवता येतो का ? इन्स्पेक्टर ब्रिजेश लाल याला अचानक सस्पेंड का केले जाते ? आपल्या मित्राला वाचवण्यासाठी अमर यशस्वी होतो का? रातोंका राजा अवतरतो तेव्हा कोणालाही न सुटलेलं कोडं तो सोडवू शकतो का ? उस्मान चाचा ची झोपडी या संपूर्ण केस मध्ये महत्त्वाची का ठरते ? असल्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे पडद्याआड वाचून सुशिंच्या वाचक प्रेमींना मिळतील.
पडद्याआड चे वैशिष्ट्य हे आहे की रातों का राजा , गोल्डी , इन्स्पेक्टर लाल, मोहिनी आणि मास्टर ब्रेन बॅरिस्टर अमर विश्वास यांच्या मेंदूची कसोटी लागते. मिस  फरीयास अमरला गुंडळते का ? की अमर एका भयानक चक्रव्यूहात अडकतो ? त्यातून तो सुटतो की नाही ? भैय्या सारंग हे महत्त्वाचे पात्र असून या पात्राचे हादरवून टाकणारे सत्य काय असते ? अशा जबरदस्त वातावरण निर्मिती करणारी आणि वाचायला हवीच अशी कादंबरी म्हणजे पडद्याआड.

समथिंग - एक थरकापवणारी भयकथा

  पुस्तकाचे नाव : समथिंग लेखक : सुहास शिरवळकर मला समथिंग का आवडते त्याची अनेक कारणे आहेत. १. इतर भयकथा मधून जे दिसते ते हिरवे ड...